वळती: ग्रामपंचायतीला दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे निधी दिला जातो. मात्र, हा निधी किती मिळतो, तो कसा वाटला जातो आणि कशा पद्धतीने खर्च केला जातो, याची माहिती अनेकांना नसते. गावाचा विकास योग्य प्रकारे होण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ही माहिती गावातील प्रत्येक नागरिकाला असणं महत्त्वाचं आहे, कारण गावाचं भविष्य आपल्या हातात आहे. या लेखात आपण ग्रामपंचायतीच्या निधीचे विविध स्रोत, अंदाजपत्रक निर्मिती, आणि निधीचा वापर कसा होतो याविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कसा तयार होतो?
गावाचा आर्थिक आराखडा तयार करण्यासाठी दरवर्षी ग्रामपंचायतीमध्ये एक ठरावीक प्रक्रिया पार पडते. त्यामध्ये…
- ग्रामविकास समितीची बैठक: ही बैठक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाते.
- विषयांवर चर्चा: आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिला व बालकल्याण इत्यादी विषयांवर विचारविनिमय केला जातो.
- अंदाजपत्रक तयार करणे: गावाला किती निधी मिळू शकतो, याचा अंदाज घेतला जातो.
- निधी मंजुरी प्रक्रिया: ग्रामपंचायतीने तयार केलेले अंदाजपत्रक 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीकडे सादर करावे लागते.
- राज्य सरकारकडे पाठवणे: पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवते.
- निधी मंजूर झाल्यानंतर खर्च: निधी मंजूर झाल्यावर विकासकामांसाठी तो वापरण्यात येतो.
ही प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या आर्थिक आराखडा तयार करण्याच्या सामान्य प्रक्रियेशी सुसंगत आहे. ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांवर आधारित अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये कर आकारणी, करवसुली आणि विविध योजनांसाठी निधीचा समावेश असतो. अंदाजपत्रक तयार करताना खर्च आणि उत्पन्न यांचा संतुलित विचार केला जातो, ज्यामध्ये महिला बालकल्याण, मागासवर्गीय, दिव्यांग, आस्थापना खर्च आणि पाणीपुरवठा योजनेसाठी तरतुदींचा समावेश असतो.
तसेच, ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये गावाच्या समस्यांचा अचूक वेध घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना समाविष्ट केल्या जातात.
ग्रामपंचायतीला निधी कुठून मिळतो?
ग्रामपंचायतीला मिळणारा निधी विविध योजनांद्वारे दिला जातो. यामध्ये मुख्यतः दोन प्रकार आहेत –
- केंद्र सरकारचा निधी – विविध केंद्र सरकारच्या योजनांतर्गत हा निधी दिला जातो. उदा. 15 वा वित्त आयोग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) इत्यादी.
- राज्य सरकारचा निधी – गावाच्या आवश्यकतेनुसार राज्य सरकारकडून निधी दिला जातो. उदा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत अभियान इत्यादी.
अनेक वेळा केंद्र आणि राज्य सरकार मिळून निधी देतात. उदा. काही योजनांसाठी 60% निधी केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार पुरवते.
याशिवाय, ग्रामपंचायत कर, घरपट्टी, पाणीपट्टी, बाजारतळ भाडे, इतर शुल्क यांच्याद्वारेही स्थानिक पातळीवर निधी गोळा केला जातो.
ग्रामपंचायतीचा निधी कसा खर्च केला जातो?
ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीचा उपयोग प्रामुख्याने खालील कामांसाठी केला जातो –
- रस्ते, गटारे, नाले साफसफाई आणि पाणीपुरवठा प्रकल्प
- शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य केंद्रांची देखभाल
- गावातील स्वच्छता मोहीम आणि कचरा व्यवस्थापन
- बांधकाम, पूल, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल
- महिला आणि बालकल्याण योजना
- शेतकरी अनुदान आणि शेती विकास प्रकल्प
ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध असूनही काही वेळा निधी वेळेवर खर्च केला जात नाही, ज्यामुळे अनेक विकासकामे रखडतात. यासाठी आपण रोज नवीन आणि माहितीपूर्ण लेख rajdhanve.in या वेबसाइट वर प्रकाशित करणार आहोत. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना ग्रामपंचायत किती प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करते त्याबद्दल माहिती मिळेल.
ग्रामपंचायतीच्या निधीवर नियंत्रण कसे ठेवावे?
ग्रामपंचायतीच्या निधी आणि खर्चाची माहिती मिळवण्यासाठी भारत सरकारने काही डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये दोन महत्त्वाचे पर्याय आहेत –
1. ‘ई-ग्राम स्वराज’ अॅप आणि वेबसाइट
भारत सरकारने ‘ई-ग्राम स्वराज’ हे अॅप आणि वेबसाइट विकसित केली आहे. याच्या मदतीने ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या अॅपमध्ये गावाचा संपूर्ण आर्थिक हिशोब पाहता येतो.
माहिती कशी मिळवायची?
- ‘ई-ग्राम स्वराज’ अॅप डाउनलोड करा.
- राज्य, जिल्हा, तालुका, पंचायत समिती आणि गावाचे नाव निवडा.
- त्यानंतर तुम्हाला चार महत्त्वाचे पर्याय दिसतील –
- ER Details – निवडून आलेल्या सदस्यांची माहिती.
- Approved Activities – मंजूर विकासकामांची यादी.
- Financial Progress – निधी किती मिळाला आणि कसा खर्च झाला याचा तपशील.
- Asset Register – गावातील मालमत्तेची नोंद.
2. ‘मेरी पंचायत’ अॅप आणि वेबसाइट
भारत सरकारने ग्रामपंचायतीच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी ‘मेरी पंचायत’ हे अॅप आणि वेबसाइट देखील उपलब्ध करून दिली आहे.
‘मेरी पंचायत’ अॅप बद्दल महत्त्वाची माहिती:
- हे अॅप ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या निर्णयप्रक्रियेत अधिक सहभाग घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
- याद्वारे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा, विकासकामे, निधी खर्च, योजनांची अंमलबजावणी आणि तक्रार नोंदणी यासारख्या सुविधांचा वापर करता येतो.
- ग्रामस्थांना आपल्या गावातील योजनांबाबत थेट माहिती मिळावी आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी, यासाठी हे अॅप उपयुक्त आहे.
‘मेरी पंचायत’ अॅप कसे वापरायचे?
- ‘मेरी पंचायत’ अॅप डाउनलोड करा.
- राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- ग्रामपंचायतीच्या योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी संबंधित पर्याय निवडा.
- तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी Feedback किंवा Grievance नोंद करा.
3. माहिती अधिकार कायद्याद्वारे (RTI) माहिती मिळवणे
जर ग्रामपंचायतीच्या निधी किंवा खर्चाची माहिती डिजिटल माध्यमातून मिळाली नाही, तर माहिती अधिकार कायद्याचा (RTI – Right to Information Act) वापर करून ती अधिकृतरीत्या मागता येते.
RTI अंतर्गत माहिती कशी मागायची?
- ग्रामपंचायतीच्या सरपंच किंवा सचिवाकडे अर्ज द्या.
- RTI अर्जात खालील माहिती नमूद करा:
- कोणत्या आर्थिक वर्षातील माहिती हवी आहे.
- कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आणि कसा खर्च झाला?
- कोणत्या विकासकामांसाठी निधी वापरण्यात आला?
- अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा आणि त्याची पावती घ्या.
- 30 दिवसांच्या आत माहिती मिळाली पाहिजे. जर माहिती मिळाली नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करू शकता.
RTI चा वापर का करावा?
- निधी योग्य ठिकाणी खर्च होतोय का, याची खात्री करता येते.
- ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता राहते.
- भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखण्यास मदत होते.
माहिती अधिकार अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ग्रामस्थांची जबाबदारी
ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य वापर होत आहे का, हे जाणून घेण्यासाठी ‘ई-ग्राम स्वराज’, ‘मेरी पंचायत’ आणि माहिती अधिकार कायद्याद्वारे गावकरी गावाच्या निधी व खर्चावर नियंत्रण ठेऊ शकतात. ज्यामध्ये…
- गावाच्या विकासकामांची माहिती मिळवा.
- निधीचा उपयोग योग्य ठिकाणी होतोय का, हे तपासा.
- ग्रामपंचायतीच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्या.
- ग्रामसभा नियमितपणे हजर राहून निधी आणि विकासकामांबाबत माहिती घ्या.
- पंचायत सदस्यांकडे निधीचा तपशील विचारण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे.
- ‘ई-ग्राम स्वराज’ अॅपचा वापर करून निधीच्या खर्चावर लक्ष ठेवा.
गावाचा विकास पारदर्शक आणि लोकसहभागातूनच होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने डिजिटल सुविधांचा व माहिती अधिकाराचा वापर करून आपल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
गावाच्या विकासासाठी निधी योग्य प्रकारे आणि पारदर्शक पद्धतीने खर्च होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या निधीवर लक्ष ठेवले तर भ्रष्टाचार टाळता येईल आणि विकासकामे वेळेवर पूर्ण होतील. गावाचा विकास हा संपूर्ण गावाच्या सहकार्यानेच शक्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य वापर होतोय का, हे जाणून घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
याबद्दल सविस्तर माहिती आपण “असे आमचे वळती गाव” या लेखमालिकेत पाहणार आहोत. त्यासाठी आमच्या व्हाट्स अँप चॅनेल ला Follow करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला नियमित अपडेट्स मिळत राहतील.
हे पण वाचा- वळती ग्रामपंचायतीत आर्थिक गोंधळ? हजारांचे काम, लाखोंची बिले! अन माहिती देण्यास टाळाटाळ…